Showing posts with label भारतीय. Show all posts
Showing posts with label भारतीय. Show all posts

Monday, 25 April 2022

बाबासाहेब - एक परफेक्ट स्ट्रॅटेजीस्ट…

बाबासाहेबांचं तरुण वयापासूनच एक निश्चित ध्येय्य ठरलेलं होतं. त्यासाठी त्यांनी आखलेली रुपरेषा अगदी परफेक्ट होती. त्यात अनेक अडथळे आले. अनेक प्रलोभनं आली. पण ते बधले नाहीत. डगमगले नाहीत. त्यांनी आपला प्रवास चालूच ठेवला. अनेकांनी त्यांना फक्त शिक्षणात लक्ष घालत असल्यामुळे देशप्रेमाचे उपदेश देखील केले. पण त्यांची स्ट्रॅटेजी परफेक्ट होती. आधी शिक्षण, आकलन, संघटन आणि मगच संघर्ष...“प्रॉव्हिन्शल डिसेंट्रलायझेशनऑफ इम्पिरियल फायनान्स ईन ब्रिटिश इंडिया” हा विषय घेऊन १९२१ च्या जुन महिन्यात बाबासाहेब एम. एस्सी. झाले. आता एम. एस्सी. ची पदवी मिळाल्यवर डॉक्टरेट साठी अभ्यास सुरु केला. डॉक्टर ऑफ सायन्स साठी “रुपयाचा प्रश्न” (The Problem of The Rupee) हा प्रबंध लिहुन १९२२ च्या पहिल्या तिमाहित लंडन विद्यापिठाला सादर केला. याच दरम्यान ते बॅरिस्टर झाले. या प्रबंधाच्या लिखानामुळे या आधि त्याना बॅरिस्टरच्या परिक्षेला बसता आले नाही.खरं तर १९२२ च्या मार्च-एप्रिल नंतर बाबासाहेबांचं लंडन मधिल शिक्षण पुर्ण झालं होतं. त्याना एम. एस्सी. व बॅरिस्टर या दोन्ही पदव्या मिळाल्या होत्या. डॉक्टरेट साठी प्रबंध सादर केला होता. आता त्यांच्याकडे मोकळा वेळ होता. पण या दरम्यान बॉन विद्यापिठातुन एखादी पदवी घ्यावी म्हणुन बाबासाहेब १९२२ च्या मे महिन्यात बॉनला पोहोचले. पण तिथे असतानाच त्यांना लंडनहून बोलावणं आलं. प्रा. एडविन कॅनन यांनी बाबासाहेबान ताबडतोब लंडनला परत येण्याचे कळविले. कारण बाबासाहेबांनी सादर केलेला प्रबंध ब्रिटीश राजवटीची लक्तरं त्यांच्या देशातील वेशीवर टांगणारा होता.त्यामुळेच प्राध्यापकानी या प्रबंधाचा तिखटपणा जरा कमी करायची सुचना दिली. बाबासाहेबांनी साफ शब्दात इन्कार केला. पण अखेरिस त्यांचा नाईलाज झाला. आणि त्यांनी ही सुचना मान्य केली पण आता तिकडे बॉन विद्यापिठाचा अभ्यास नुकताच चालु केल्यामुळे लगेच हा बदल करुन सुधारित प्रबंध सादर करणे जमणार नव्हते. या आधी लंडन विश्वविद्यालयाच्या विद्यार्थी संघापुढे “जबाबदार सरकारचे दायित्व” या विषयावर बाबासाहेबानी एक निबंध वाचला होता. तेंव्हा वातावरण फार तापले होते.१४ एप्रिल १९२३ रोजी बॅरिस्टर बाबासाहेब भारतात परतले तरी डॉक्टरेट मिळणं बाकीच होतं. चार महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर प्रबंधात योग्य सुधारणा करून तो पुन्हा सादर करण्यात आला. यावेळेसबाबासाहेबांंनी भाषेच्या अशा काही करामती केल्या की मूळ गाभा न बदलता आणि टिकेची धार जराही कमी न करता प्रा. एडविन यांना तो प्रबंध स्विकारावाच लागला. अन १९२३ च्या शेवटी लंडन विद्यापिठाने तो प्रबंध स्विकारुन बाबासाहेबाना “डॉक्टर ऑफ सायन्स” हि पदवी बहाल केली. लंडन मधिल पी. एस. किंग ऍंन्ड सन्सने १९२३ च्या डिसेंबर महिन्यात “द प्रोब्लेम ऑफ रुपी” हा प्रबंध ग्रंथ रुपाने प्रकाशित केला.इथपर्य़ंत बाबासाहेबांच्याशिक्षणाचा एक भला मोठा टप्पा पार पडला. आणि मग त्यांचा समाजकारणात प्रवेश झाला. थोडक्यात काय बाबासाहेबांनी स्वतः दिलेला संदेश.. शिका, संघटित व्हा अन् संघर्ष करा.. हा त्यांनी स्वतः अंमलात आणला. 1927 पर्यंत त्यांनी संघटनावर भर दिला. त्यात तीन वर्षे इनवेस्ट केलीत. त्यानंतरच ते राजकारणात उतरले.आणि आपण .. तीन मिनिटाचा बाईट मिळाला की.. गल्लीतले राष्ट्रीय नेते होतो...असो..

Sunday, 24 April 2022

'अनाहिलेशन ऑफ कास्ट'

'अनाहिलेशन ऑफ कास्ट'आधुनिक भारतातील जातनिर्मूलन आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचापाया ज्या पुस्तकाने रचला ते पुस्तक म्हणजे दि अॅनहिलेशन ऑफ कास्ट...आजपासून सुमारे ८० वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अॅनहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक प्रकाशित झाले. खरं तर या पुस्तकाने प्रकाशनापूर्वीचभारतातील सामाजिक आणि धार्मिक राजकारणात प्रचंडखळबळ माजवली होती. परंतू त्याच्या प्रकाशनाच्या आज ८० वर्षांनंतरही या पुस्तकानं केलेलं क्रांतिकारक कार्य आपल्या अनुभवाला येत आहे.हे पुस्तक खरे तर एक भाषण आहे. १९३५ साली लाहोर येथील जातपात तोडक मंडळाच्या वार्षिक आधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी करावयाचे अध्यक्षीय भाषण आयोजकांना आधिवेशनाआधीच पाठवून दिले होते. ते भाषण इतके टोकदार होते की आयोजकांना ते पचनी पाडताच आले नाही. त्यांनी घाबरून तो कार्यक्रमच रद्द करून टाकला. आणि ते भाषण झालेच नाही. त्यावेळी देशभरात प्रचंड मोठा वाद या निमित्ताने घडूनआला. गांधीजीसोबत अनेक दिग्गज नेत्यांनी या झाल्या प्रकारावर टिप्पणी केली होती. मग बाबासाहेबांनी सदर भाषण जसेच्या तसे १५ मे १९३६ रोजी पुस्तक रुपात प्रसिद्ध केले. भाषणाचे नाव होते... दी अॅनहिलेशन ऑफ कास्ट...मराठीत जातिसंस्थेचे निर्मूलन या नावाने प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकात बाबासाहेबांनी जातिव्यवस्थेची अतिशय क्रांतिकारी अशी समीक्षा केली होती.. त्यात प्रथमतःच जात ही मनाची अवस्था किंवा वृत्ती आहे ... इतकी सरळ आणि स्पष्ट मांडणी करण्यात आली होती. त्यातबाबासाहेब म्हणतात की...."जात ही मनाची अवस्था किंवा वृत्ती आहे. जातिविनाश म्हणजे भौतिक बंधनांचा विनाश नव्हे. जातिविच्छेद म्हणजे मनोवृत्तीतील परिवर्तन... हिंदू जातिभेद पाळतात कारण ते बुद्धिहीन वा अमानुष आहेत म्हणून नव्हे, तर ते धर्मपरायण असल्यामुळे! याला त्यांच्या मनात जातीय वृत्ती रूजविणारा धर्म जबाबदार आहे. खरा शत्रू जातिभेदपाळणारे लोक नसून त्यांना तो धर्म पाळावयास शिकविणारी शास्त्रे आहेत. त्यामुळे शास्त्रप्रामाण्यावरील श्रद्धा नष्ट करणे हाच खरा उपाय आहे. लोकांच्या श्रद्धा व मते यांची जडणघडण शास्त्रे करीत असताना आणि त्यांचा लोकांच्या मनावरील पगडा कायम असताना तुम्हाला यशाची अपेक्षा कशी करता येईल? धर्मशास्त्रप्रामाण्यास स्वत: आव्हान द्यायचे नाही, लोकांना शास्त्रांच्या आज्ञांवर विश्वास ठेवू द्यायचा आणि पुन्हा त्यांच्या वागणुकीवर व कृतींवर अमानुष, अविवेकी अशा विशेषणांनी टीका करायची, हा समाजसुधारणेचा मार्ग विपरीतच म्हटला पाहिजे. श्रीमान गांधींसकट कुणीही ही गोष्ट लक्षात घेतलेली दिसत नाही की, लोकांच्या कृती म्हणजे शास्त्रांचा त्यांच्या मनावर झालेल्या संस्कारांचा परिपाक होय. त्यामुळे त्यांची वागणूक ज्या शास्त्रांवर आधारित आहे त्या शास्त्रांवरील विश्वास उडाल्यावाचून ते आपले वर्तन बदलणार नाहीत. म्हणून समाजसुधारकांचे सर्व प्रयत्न फसले यात नवल नाही... धर्मशास्त्रांच्या जोखडातून प्रत्येक स्त्री-पुरुषास मुक्त करा.म्हणजे मग पहा, ते स्वत:च सहभोजन व आंतरजातीय विवाह करतात की नाही!.... शास्त्रप्रामाण्य धुडकावण्याची भगवान बुद्धाने जी भूमिका स्वीकारली ती तुम्ही स्वीकारा!"गांधीजींनी या पुस्तकाचे समीक्षण करताना हरिजन मध्ये दोन दीर्घ लेख लिहीले. आणि त्या लेखांतून डॉ. आंबेडकरांवर कसून टिका केली. डॉ. आंबेडकरांनी देखील या टिकेचे खंडन करणारे लेख लिहीले. या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीत बाबासाहेबांनी गांधीजींनी केलेली टिका आणि त्यांचे खंडन या दोहांचाही समावेश केला. सोबतच हे पुस्तक मराठी सोबत इतर अनेक भाषांत प्रसिद्ध केले गेले.पण या ग्रंथाचा सर्वात जास्त प्रभाव हा गांधीजीवर पहायला मिळाला. सुरूवातीच्या आयुष्यात चातुर्वण्य, जातिव्यवस्थेचे,सनातनी धर्माचे कट्टर पुरस्कर्ते असलेले गांधीजी मात्र नंतर आंतरजातीय विवाहाचे उघड उघड पुरस्कर्ते झाले. याचा दुरगामी परिणाम देशाच्या समाजकारणावर घडून आला. काँग्रेसच्या नीतींमध्ये बदल घडून आला. लोकांचा अस्पृश्यांसोबतचइतर जातींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलूलागला. जातीपातींच्या भिंतींना सुरूंग लावण्याचं काम केलं ते... अॅनहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथानं…

Saturday, 23 April 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कामगार-2

बाबासाहेबांनी कामगारांना दिलेली अजून एक बहुमूल्य देणगी म्हणजे मजूरांचा थेट संबंध संसदीय लोकशाहीशी जोडणं. तोपर्यंत मजूरांचा संबंध केवळ सत्ता उलथवणे, रक्तरंजीत क्रांति करणे इथपर्यंतच होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यासंबंधी 'मजूर आणि संसदीय लोकशाही' या विषयावर त्यांनी एका शिक्षणवर्गात केलेले भाषण प्रसिध्द आहे. आपण जरूर ते मिळवून वाचावे ही नम्र विनंती.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मनोमन इच्छा होती की, मजुरांच्या मूलभूत गरजांबरोबर आधुनिक राजकीय प्रवाहात मजुरांनी सहभाग घ्यावा. स्वतःचा राजकिय उत्कर्ष करावा. आणि म्हणूनच मजूरमंत्री यानात्याने त्यांनी 8 नोव्हेंबर 1943 रोजी संसदेत एक विधेयक आणले. ते होते 'मजूर संघटनांना मान्यता देण्याची सक्ती करणारे विधेयक'.आपल्या कामाला समाजमान्यता, सरकारमान्यता मिळणे फार मोठी गोष्ट असते. बाबासाहेबांनी हे विधेयक मांडले आणि स्वतःच्या वाक्चातुर्याच्या जोरावर विधेयक मंजूर देखील करून घेतली. आजवर केवळ एक बिगारी कामगाराचा दर्जा असलेला मजूर आता सुबुध्द नागरिक आणि कर्मचारी गटात गेला. त्याला त्याच्या अस्तित्वाची हमखास ओळख मिळाली. याहून मोठं काम काय असू शकतं. कारण सरकारच्या लेखी मजूरांचं जगणं आता दखलपात्र गोष्ट बनली होती. सरकारला मजूरांच्या समस्यांना अग्रक्रमाने प्राधान्य देणं बंधनकारक बनलं होतं.बरं एवढ्यावर थांबतील ते बाबासाहेब कसले. ते निडर होते तसे अॅडव्हेंचरस सुद्धा. मी मंत्री आहे. मातीत जाणार नाही. हात काळे करणार नाही वगैरेसारख्या गोष्टींना फाट्यावर मारणारा माणूस. एकदात्यांचा दौरा बिहार प्रांतात होता. तत्कालीन वर्तमानपत्रांतून बिहारमधील खाण कामगारांच्या एकुण दयनीयतेच्या बातम्या छोट्या छोट्या स्वरूपात प्रसिद्ध होत होत्याच. बाबासाहेबांनी स्वतः तिथंजाण्याचा निर्णय घेतला. सुटा-बुटातला मंत्री खाणीत थेट साडे-चारशेफुट खोल जाऊन त्यांनी कामगारांशी संवाद साधला. आणि तिथून सुरू झाला खाण कामगारांच्या उत्कर्षाचा नवा अध्याय. खाण मजूरांची मजुरांची सुरक्षितता, प्रसाधन व्यवस्था आणि आरोग्य सुविधा ह्या कामाच्या ठिकाणी तसेच त्यांच्या वसाहतीत करणे हे सरकारचे कर्तव्यआहे. आणि ते पूर्ण करणे हे सरकारला बंधनकारक असल्याचे नोंदवून ठेवले.खाणकामगारांसोबतची बाबासाहेबांची भेट त्या काळात प्रचंड गाजली. त्यामुळे विविध स्तरांतील कामगार बाबासाहेबांची तातडीनं भेट घेऊ लागले. कामगारांच्या नानाविध समस्या ऐकून घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की, मोठमोठ्या कंपन्या, फॅक्टरीजमध्ये मालक लोक कामगारांच्या संघटनांना मान्यताच देत नाहीत. त्यामुळे कामगारांना स्वतःचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे मंच उपलब्ध नाहीत. अशातच बाबासाहेबांकडे येणारा प्रत्येक कामगार समुह त्यांना आता स्वतःचे नेतृत्व करण्याचे साकडे घालत होता. नेतृत्वाची चालत आलेली आयती संधीला भूलले तर ते बाबासाहेब कसले.. त्यांनी स्पष्ट शब्दात नेतृत्व करण्याचे नाकारले उलट म्हणाले.. तुम्ही निश्चिंत रहा. पुढच्या आठवड्याभरात यावर निराकरण होईल.१३ नोव्हेंबर, १९४३ रोजी विधीमंडळाच्या आधिवेशनात बाबासाहेबांनी बोलण्यास सुरूवात केली. कामगारांचे प्रश्न त्यांना आपल्या संघटनेमार्फत मांडता यावेत याकरिता १३ नोव्हेंबर, १९४३ रोजी भारतीय श्रमिक संघटना कायद्यामध्ये दुरुस्ती करणारे विधेयकही त्यांनी विधिमंडळामध्ये मांडले. या विधेयकामध्ये कामगार संघटनांना मान्यता देण्याचे बंधन मालकांवर टाकण्यात आले होते; तसेच कामगार संघटनांनी पूर्तता करायच्या अटी नमूद केल्या होत्या.मुद्दा असा की, कामगार नेते म्हणून बाबासाहेबांनी कामगारांना ज्या अमूल्य देणग्या दिल्या आहेत त्याचा विसर कदाचित सर्वच कामगार संघटनांना पडलेला आहे. बरं वर उल्लेख केलेले सर्व नियम, सुचना, कायदे आजही जसेच्या तसे कार्यान्वित आहेत हे सुद्धा नोंदीत ठेवावे.

Friday, 22 April 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कामगार-1

बरं बाबासाहेबांनी केलेल्या या दोन गोष्टी आपल्याला ठाऊक आहेत का?स्वातंत्र्यपूर्व कालखंडात विविध क्षेत्रांत जेथे जेथे स्किल्ड लेबरची गरज असे तिथे भारतीय कामगारांना एंट्री नव्हती. तेथे काम करण्यासाठी इंग्लंडवरून कामगार आयात केले जात. आणि जे काही स्किल्ड वर्कर होते त्यांना नेमकं कसं हुडकून काढावं याचा मोठा पेच ब्रिटीशांपुढे होता. त्यामुळे अनेक कामांसाठी इंग्लंडवरून कामगारांची मोठी आयात होत असे. बाबासाहेबांनी मजूर मंत्री पदाचा चार्ज सांभाळताच सर्वात आधी ही आयात थांबवली. आणि येथील कामगारांच्या हक्काचे काम त्यांना मिळवून दिले.

1. बाबासाहेबांनी १९५३ साली ‘मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम, १९५३ हा कायदा गठीत करण्यात आला.

2. १३ मार्च १९५४ ला कोळसा उत्पादन आणि स्त्री खाण कामगार या दोन्ही बाबींचा विचार मांडून कामगारांचा महागाई भत्ता, नुकसान भरपाई, असमान महागाई भत्त्याला मजूर संघटना जबाबदार, बेकारीच्या काळातील नुकसान भरपाईची पद्धत, कामगाराचा राजीनामा, खाण कामगारांचे वेतन व सवलती, मजूर खात्याचा नोकरवर्ग, कोळशाच्या उत्पादनाचा प्रश्न, स्त्री खाण कामगार आणि महिला परिषद यावर डॉ. आंबेडकरांनी भरीव काम केले.

3. ज्याप्रमाणे पुरुष खाण कामगारांबद्दल डॉ. आंबेडकरांनी विचार व्यक्त केले त्याचप्रमाणे स्त्रियांबाबतही२९ मार्च १९४५ ला विधेयक आणून चर्चा केली. स्त्री कामगारांचे हित जोपासले. प्रसुतीच्या काळात विश्रांतीची तरतूद, रोख मदत इत्यादी तरतुदी केल्या.

4. किमान चार आठवडे प्रसुती भत्ता मिळावा तसेच कामगार गैरहजर असताना त्यांना पगारी सुट्ट्या मिळाव्यात त्याचबरोबर कायद्याखाली नियम करण्याचा अधिकार आणि खाण कामगारांना शॉवर बाथचीयोजनासुद्धा अंमलात आणली होती.

5. युद्धकाळातही मजुरांना योग्य न्याय मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यातील नोकरीच्या अटशक्तीचा लवाद, मजुराचे प्रश्न व मजूर खाते, स्त्री पक्ष मजूर परिषदेचे महत्त्व, मजुराचे बहुरंगी पुढारी, पगारी सुट्यांचे वर्गीकरण केले.

6. हे सर्व कायदे आजही अंमलात आहेत. एंम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्येफॉर्म भरणाऱ्या मुलांना ही गोष्ट ठाऊक असायला हवी. आज सरकारी सेवेतील महिलांना मिळणारी प्रसूती रजा. स्वरक्षणाचे हक्काची व्याख्या नैसर्गिक हक्क म्हणून करणे, चाईल्ड केअर लिव साठी दोन वर्षे भरपगारी रजा हे सारं काही बाबासाहेबांनीच करून ठेवलंय.

बाबासाहेबांचे कामगार धोरण हे डाव्या विचारसरणीच्या अगदी भिन्न होते. डाव्यांनी कायम कागारांना संपाच्या बेडीत अडकवून एकसुरू संघर्षाची सवय घालून दिली. खरा दोष तर भांडवलदांरांत होता. बाबासाहेबांनी नेमकं हेच हेरलं होतं. संप करणे हा अपराध मानून अनेक मालकांनी कामगार कपातीचं धोरण अवलंबलं होतं. शेकडो मजूरांच्या नोकऱ्या गेल्या. आणि त्यातून उभा राहीला होता औद्योगिक कलहाचा वाद.सप्टेंबर 1938 साली मुंबई विधिमंडळात औद्योगिक कलहाचे विधेयक विचारासाठी मांडले गेले. बाबासाहेब आणि जमनादास मेथा यांनी त्याला कडाडून विरोध केला. कारण त्या विधेयकाअन्वये 'विशिष्ट परिस्थितीत संप करणे बेकायदेशीर ठरविले होते.'बाबासाहेब म्हणाले, ''संप करणे हा दिवाणी अपराध आहे, फौजदारी गुन्हा नव्हे. मनाच्या इच्छेविरुध्द त्याला काम करण्यास भाग पाडणे म्हणजे कामगाराला गुलाम बनविणे होय. संप म्हणजे कामगारांचा आपण कोणत्या अटीवर नोकरी करण्यास तयार आहोत, हे सांगावयाचे स्वातंत्र्य असलेला हक्क होय.'''कामगारांच्या नागरिक स्वातंत्र्याच्या गळचेपीचा कायदा' या विषयावर बाबासाहेबांची सभापतींशी वादळी चर्चा झाल्याने बाबासाहेबांनी सभागृहाबाहेरच संप पुकारण्याचा पवित्रा घेतला. जवळपास लाखाची सभा झाली. त्यात ९० टक्क्यांहून अधिक तर स्वतंत्र मजूर पक्षाचेच होते. हा संप अयशस्वी व्हावा यासाठी गिरणी मालकाने पोलिस बळाचा वापर केला. त्यात ७२ कामगार जखमी झाले. ३५ कामगारांना अटक झाली. पण संप यशस्वी झाला. कामगार संघटनांचा विजय झाला. स्वतंत्र मजूर पक्ष बळकट झाला. या कामगारांच्या लढ्यामुळे मालक, भांडवलदार वर्गात प्रचंड खळबळ माजली होती. संपाच्या सांगता सभेत बाबासाहेब म्हणाले,''केवळ सभेत उपस्थित राहून घसा फुटेपर्यंत काळया कायद्याचा निषेध करून कार्य होणार नाही. आपले प्रतिनिधी निवडून देऊन तुम्ही राज्यसत्ता हस्तगत केली पाहिजे.'' आता बाबासाहेबांची प्रतिमा प्रथम श्रेणीचे कामगार नेते म्हणून झाली होती.यानंतर लगेच 1938 च्या मातंग (पंढरपूर) परिषदेनंतर बाबासाहेब शेतावर राबणाऱ्या मजूरांच्या प्रश्नाला भिडले. त्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना भेटले. पुन्हा मोर्चासमोर झालेल्या भाषणामुळे मजूर या विषयाचे क्षेत्र तर व्यापक झालेच, तसेच 'कामगार नेतेपद' ही अधोरेखित झाले.यानंतर दि. 12 जुलै 1941 रोजी म्युनिसिपल कामगार संघाच्या अधिवेशनात बाबासाहेबांनी मार्गदर्शन केले. या सर्व चिंतनाचा, कार्याचा परिणाम असा झाला की, तत्कालीन व्हाइसरॉय लिनलिथगो यांनी 2 जुलै 1942 रोजी आपल्या कार्यकारी मंडळात मजूरमंत्री म्हणून बाबासाहेबांचा समावेश केला. 

अपुर्ण...

Thursday, 21 April 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना समितीवरील निवड

बाबासाहेब आंबेडकरांच्या घटना समितीतील प्रवेशासंबधी दोन निवडणूका महत्त्वाच्या आहेत. पहिली निवडणूक होती ती 1946 सालची आणि दुसरी 1952 सालची. 1937 साली झालेल्या मुंबई प्रांतिक असेंब्लीच्या निवडणूकांत बाबासाहेबांच्यास्वतंत्र मजूर पक्षाने विजयी पताका फडकावत 15 आमदार निवडून आणले. परंतू 1946 सालच्या निवडणूकीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाल्याने बाबासाहेबांची राज्यसभा हुकली. खरं तर त्यांचा राज्यसभेत प्रवेश होऊ नये यासाठी काँग्रेसने पक्की तयारी केली होती.यावर उत्तर देताना अतिशय कष्टी मनानं बाबासाहेब म्हणाले... ‘मला घटना समितीची दारे, खिडक्या बंद करण्यात आली. इतकेच काय, हवा येण्यासाठी जी तावदाने लावली जातात, ती सुद्धा बंद करण्यात आली आहेत.”इथं मुंबई विधिमंडळात डॉ. आंबेडकरांचे पक्षाचे सभासद नव्हते. तत्कालीन मंत्रिमंडळात मागास जातींचं प्रतिनिधीत्व केवळ दोनच खांद्यांवर होतं. आणि ते म्हणजे बॅ. जोगेंद्रनाथ मंडल आणि बाबू जगजीवनराम. बॅ. जोगेंद्रनाथ मंडल हे तत्कालीन हंगामी मंत्रिमंडळात कायदेमंत्री म्हणून कार्यरत होते.त्याच दरम्यान त्यांनी मुंबई इलाख्याला भेट दिली. तेथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी डॉ. आंबेडकरांनी लंडनमध्ये केलेल्या धडपडीबद्दल समाधान व्यक्त केले. आपल्या मंत्रिमंडळातील प्रवेशाला डॉ. आंबेडकरांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे पत्रकारांना सांगितले आणि बॅ. मंडल यांनी डॉ. आंबेडकरांनी बंगाल विधिमंडळातील मागास वर्गाच्या प्रतिनिधींच्या समर्थनावर घटना समितीसाठी डॉ. आंबेडकरांना नामांकन भरावयाचे सुचविले.स्वातंत्र्यपूर्व काळात नेमण्यात आलेल्या कॅबिनेट मिशनने सुचवलेल्या शिफारशींनुसार संविधान सभेसाठी सदस्य निवड सुरू झाली.बाबासाहेबांनी बंगाल विधान परिषदेतून आपले नामांकनपत्र भरले. बंगाल विधानपरिषदेत एकुण साठ जागा होत्या. त्यातील 27 जागा ह्या हिंदू तर ऊर्वरित 33 जागा ह्या मुस्लिमांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. कॅबिनेट मिशनने बंगाल प्रांतातील अनुसुचित जातींनाहिंदू जागांसोबतच जोडून टाकले होते. निवडणूकीची तारिख ठरली 17 जुलै 1946. या निवडणूकीसाठी बाबासाहेब आधीपासूनच कोलकात्यात ठाणमांडून होते.तत्कालीन बंगाल प्रांतात हजारोंच्या संख्येत पंजाब प्रांतातील अस्पृश्य चर्मोद्योग करीत होते. ते बंगाली भाषिक अस्पृश्यांबरोबरखांद्याला खांदा लावून संघर्षात सहभागी झाले होते. या संयुक्त मोर्च्याने डॉ. आंबेडकरांना संविधान सभेत निवडून पाठविण्याची प्रतीक्षा केली होती. ते विधायकांच्या घरांपुढे निदर्शने करून बाबासाहेबांना मत देण्याचे वचन घेत असत. राजकीय जीवन आणि मृत्यूचाहा संघर्ष मतदानाच्या दिवसापर्यंत चालू होता. बाबासाहेबांना बंगाल विधान परिषदेतील अँग्लो इंडियन सदस्यांच्या समर्थनाची अपेक्षा होती. परंतु त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यामुळे त्यांच्या समर्थनापासून बाबांना वंचित राहावे लागले.बाबासाहेबांनी निवडणूकीसाठी बॅ. मंडल यांच्या साथीने जय्यत तयारीकेली होती. निवडणूकीच्या दिवशी काही दगाबाजी होऊ नये म्हणून हजारोमागास-वर्गीय आणि पूर्वास्पृश्य बाबासाहेबांच्यानावाचा जयजयकारकरत विधान भवनाच्या आवारात पोहोचले. आणि त्यानंतर घडलेल्या घटना क्वचितच इतिहासात ठळकपणे सांगितल्या गेल्या आहेत. त्या अशा...17 जुलै 1946 च्या दिवशी बंगाल प्रांतातील हजारो मागास-वर्गीय आणि पूर्वास्पृश्य बॅ. मंडल यांच्या नेतृत्वाखाली बंगाल विधान भवनाच्या आवारात दाखल झाले. पोलिसांच्या लाठ्या आणि अचानकपणे होणाऱ्या गोळीबाराची पूर्वकल्पना असूनही लोकांनी हेतूपुरस्सरपणे विधान भवनाचा परिसर घेरून टाकला. पंजाबी – शीख मागासवर्गीयांच्या हातातल्या तलवारी भर उन्हात लखाखत होत्या अन बाबासाहेब आंबेडकर जिंदाबादचा नारा आकाशात निनादत होता.एवढ्यातच त्या गर्दीतून एक तरूण पुढे आला. त्यानं आपलं किरपान हवेत फिरवत जोरदार घोषणा दिली. "मी प्रतीक्षा (प्रण) करतो की, जर 'डाकदार उम्मेदगार' (पंजाबी उच्चारण डॉ. आंबेडकरांसाठी) यांना निवडणुकीत पराभूत केले गेले तर ही माझी तलवार त्या गद्दारांच्या रक्ताने लथपथ होऊन जाईल आणि मी आपल्या प्राणाची आहुती दिल्याशिवाय राहणार नाही." हा तरूण होता बुद्धसिंह... बुद्धसिंह हामूळचा जालंधर जिल्ह्यातला ढिलवा गावचा रहिवाशी. बुद्धसिंहाचा आवेश पाहताच शेकडो तरूणांनी त्याचा कित्ता गिरवत प्रतीज्ञा केली. निवडणूकीच्या दिवशी जमलेल्या जमावाचे रौद्र रुप पाहून प्रशासन व्यवस्थेनेही नरमाईची भूमिका घेत वातावरण शांत करण्याची भूमिका घेतली. अखेर निवडणूक कोणत्याही प्रकारे हिंसाचार न होता पार पाडली.या मोर्च्याचा उल्लेख तत्कालीन कलकत्याहून प्रकाशित होणाऱ्या जवळपास सर्वच दैनिकांनी घेतली.कलकत्याहून प्रकाशित होणाऱ्या डेली स्टेटमन या वर्तमान पत्रात 18 जुलै 1946 रोजी फोटोसहित सदर मोर्च्याची बातमी देण्यात आली होती."ज्यावेळी मतदान चालू होते त्यावेळी ऑल इंडिया शेड्युल्ड कास्टस् फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनीपरिषदेच्या आवारात प्रवेश करून डॉ. भीमराव आंबेडकरांच्या जयजयकाराचे नारे लावून निदर्शने केले. या संपूर्ण निवडणूक अभियानात जोगेंद्रनाथ मंडल यांनी दलित निदर्शकांचे नेतृत्व केले. कारण त्यांच्याच विनंतीवरून बाबासाहेबांनी बंगाल विधान परिषदेतून निवडणूक लढण्याची स्वीकृतीदिली होती.२० जुलै १९४६ ला निवडणुकीच्या निकालाची घोषणा झाली. बाबासाहेब आंबेडकर नुसते विजयीच झाले नाही तर काँग्रेसी नेते शरदचंद्र बोस यांच्यापेक्षाहीसर्वात जास्त मतांनी ते निवडून आले. सहा काँग्रेसी आमदारांनी आपल्या पक्षाच्या सचेतकाची पर्वा न करता बाबासाहेबांना मतदान केले. बाबासाहेबांच्याविजयामुळे देशात आनंदाची लहर पसरली. कलकत्यात प्रचंड जुलूस निघाला." लोकांनी भांगडा नाच केला. ढोलताशे वाजविले, फटाके उडविले. बाबासाहेबांच्याया नेत्रदीपक विजयामुळे संविधान सभेत दलितांचे प्रतिनिधित्व करणारा अत्यंत योग्य समर्थ, निर्भय आणि चरित्रवान महामानव पोहोचल्याने सर्वांना आनंद आणि गर्व वाटू लागला.सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले होते, "मी संविधान सभेचे दरवाजे आणि खिडक्याच नव्हे तर तावदानदेखील बंद केली आहेत, पाहतो तेथे डॉ. आंबेडकर कसा प्रवेश करतात ते, बाबासाहेबांच्याया विजयाने लोहपुरुषांची ही भीष्म प्रतिज्ञा पराभूत झाली आणि जेव्हा बाबासाहेबांना ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्षपद प्रदान करण्यात आलेतेव्हा एका काँग्रेसी नेत्याने सरदार पटेलांजवळ नाराजी व्यक्त करीत म्हटले, 'तुम्ही गांधीविरोधी आणि काँग्रेसविरोधी डॉ. आंबेडकरांना घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद कसे काय प्रदान केले ?" तेव्हा सरदार पटेल म्हणाले, "तुम्हाला संविधानाचे काय कळते? आम्हाला डॉ. आंबेडकरांशिवाय या कामासाठी अधिक योग्यतेचा कोणीच मिळाला नाही. म्हणून आम्हाला त्यांना अध्यक्षपद देण्याशिवाय गत्यंतरच नव्हते."३ ऑगस्ट १९४७ ला मंत्रिमंडळाची घोषणा झाली. त्यात बाबासाहेबांचे नाव होते. बाबासाहेबांनी १५ ऑगस्ट १९४७ ला नवीन मंत्रिमंडळाबरोबरकायदेमंत्री म्हणून शपथ घेतली. ३० ऑगस्ट १९४७ ला बाबासाहेबांना घटनेच्या मसुदा समिती (ड्राफ्टिंग कमिटी) चे अध्यक्ष पदावर निवडण्यात आले. पण हा आनंद ही फार काळ टिकणार नव्हता.15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. भारताच्या स्वातंत्र्यसोबतच संविधान निर्मितीसाठी नियुक्त करण्यात आलेली संविधान सभा समीती देखील सार्वभौम झाली. भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव करण्यात आला तेव्हा तारिख होती 15 जुलै 1947. त्या तारखेपर्यंत अस्तित्वात असलेली संविधान समिती ही अखंड भारताची समिती म्हणून मान्यताप्राप्त होती. परंतू अवघ्या महिनाभराच्या अंतराने झालेल्या फाळणीमुळे घटना समितीवरील निवडक सभासदांच्या जागा मात्र रद्द झाल्या. बंगालच्या फाळणीमुळे रद्द झालेल्या जागेत बाबासाहेबांची जागा ही होती.परंतु डॉ. जयकरांच्या राजीनाम्यामुळे रिकाम्या झालेल्या जागी मुंबई विधिमंडळातील काँग्रेस पक्षाने डॉ. आंबेडकरांची घटना समितीवर निवड केली. कारण बाबासाहेबांनी घटना समितीत केलेल्या कार्य आणि वक्तृत्वाने त्यांची योग्यता काँग्रेसला कळली होती. संविधाननिर्मिताच्या कार्यात डॉ. आंबेडकरांची योग्यता त्यांना अपरिहार्य व अटळ वाटली. या कामी डॉ. आंबेडकरांशिवाय दुसरा पर्यायच नाही याची खात्री त्यांना पटली होती.

संदर्भ-

1. प्रा. डॉ. भाऊ लोखंडे यांचे विविध वृत्तपत्रांत प्रकाशित झालेले लेखन..

2. चां. भ. खैरमोडे लिखित ८ व्या खंडातीलपृ. क्र. १९८ ते २०० वरील उतारे अणि दुर्गावास यांनी संपादित केलेल्या सरदार वल्लभभाई पटेल पत्रव्यवहाराच्या ५ व्या खंडातील भाग

Wednesday, 20 April 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुतळे

पुतळ्यांचं स्वतःचं एक राजकारण असतं. आज जर शिवरायांचे पुतळे नसते, सम्राट अशोकाने शिलालेख कोरून ठेवले नसते तर कदाचित इतिहासाची पाळंमूळं नष्ट करण्यात  कोणतीच कसर ठेवली नसती. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांच्या बाबतीतही नेमकं तेच.या संदर्भातील एक किस्सा ... केनेथ रिगनाल्ड ग्रिफिथ, वेल्श प्रांतातला हरहुन्नरी निर्माता, दिग्दर्शक. त्यानं आपल्या आयुष्यातील बराचसा काळ बीबीसी सारख्या मातब्बर संस्थेला अनेक गाजलेल्या फिल्म्स, डॉक्युमेंटरी बनवून देण्यात मार्गी लावला. पंडीत जवाहरलाल नेहरूंवर बनवलेली त्यांची डॉक्युमेंटरी फिल्म प्रचंड गाजली होती. त्याच धर्तीवर त्यांना इंदिरा गांधींच्या सरकारकडून नेहरूंवर गांधीसारखी फिल्म बनवण्याचं आमंत्रण मिळालं. केनेथ ग्रिफिथ यांनी सारी तयारी करून भारत गाठलं. आणि फिल्म बनवण्याआधी भारत फिरण्याची इच्छा व्यक्त केली. ग्रिफिथ यांनी अख्खा भारत पालथा घातला. नेहरूंच्या कार्याच्या खाणाखुणा शोधण्यासाठी त्यांनी शहरं, गावं पायाखालून घातली. पण त्यांच्या नजरेला वेगळेच चित्र आलं. गावागावात बाबासाहेबांचे पुतळे दिमाखातउभे दिसले. बाबासाहेबांचा अनुयायी वर्ग, त्यांनी केलेलं काम पाहूनकेनेथ इतका प्रभावित झाला की त्यानं स्वतः नेहरूंऐवजी बाबासाहेबांवरच सिनेमा बनवायचा चंग बांधला. तशी इच्छा त्यानं इंदिरा सरकारकडेही बोलून दाखवली. केनेथ पुन्हा इंग्लंडला रवाना झाला. भारतातील भटकंती दरम्यान जमवलेला सर्व डेटा युटीलाईज करून भली मोठी स्क्रिप्ट बनवली. स्टोरी बोर्ड तयार केला. शक्य तितकं कास्टिंग ऑन पेपर तयार ठेवलं. आणि बाबासाहेबांवर सिनेमा बनवण्यासाठी आपण तयार असल्याचे भारत सरकारला कळवलं. पण काय माहीत माशी कुठं शिंकली.. केनेथ ला पुन्हा भारतात येण्यासाठी भारत सरकारकडून व्हीजा मिळालाच नाही. थोडक्यात त्याचा व्हिजा नाकारण्यात आला. त्यानं नंतर बरेच प्रयत्न केले. पण ते सारे व्यर्थठरले. इंटरनेटवर याबाबतीत बरेचसे संदर्भ उपलब्ध आहेत. असो..Sakya Nitin ने यात दिलेली माहीती अजून ताप आणणारी.. ती अशी .."केनेथ ग्रिफिथ यांना चित्रपट बनावन्यास नकार मिळाल्यानंतर त्यांनी 700 भागांची मालिका बनविन्यासाठी काही प्रयत्न केले पण 4-5 वर्षे प्रयत्न केल्यानंतर त्याला देखील नकार मिळाला. दुर्दर्शनचे गोस्वामी नावाचे कोणी अधिकारी त्या फाइलवर कुंडली मारून बसले होते. नंतर जब्बार पटेलांचा सिनेमा आला. बरा होता तो. काही नसल्यापेक्षा असलेलं बरंच म्हणायचं. पण 1936 ते 1951 चा कालखंड अगदी दाखवायचा म्हणून दाखवून टाकला. अनेक चुका होत्या त्या अक्षम्य होत्या. असो..तर बाबासाहेबांच्यापुतळ्यात नेमकं असं काय होतं की केनेथ ग्रिफिथ भारावून गेला असावा.. गाव लागलं की गावाच्या प्रवेशद्वारावरचभविष्याकडे अंगुलिनिर्देश करणारे बाबासाहेब आपल्या नजरेस पडतात. निळा कोट अन् लाल ओठ अशा लहेज्यातील बाबासाहेब आपल्या प्रत्येक पुतळ्यात हातात संविधान, डोळ्यांत प्रचंड आत्मविश्वास, उज्ज्वल भविष्याचा आशावाद, शिका, संघर्ष करा अन् संघटित व्हा चा नारा देताना दिसतात. आज देशभरात गाव तिथं आंबेडकर ही नवी म्हणच रुजलीये.बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारची भव्यता आहे. त्यांच्या पुतळ्याच्या स्ट्रक्चरला विशिष्ट आकार आहे. ज्यात पाहणाऱ्याच्या डोळ्यांना एक आदरयुक्त भीतीचा भास होतो. एक जरब बसते. तर कोणत्याही संकटातून उभी राहण्याची उमेद ती आकृती मनात निर्माण करत असते. त्यांच्या पुतळ्याच्या रचनेत असणारं पुस्तक, मगते संविधान असो किंवा अॅनाहिलेशन ऑफ कास्ट हे कायम आपणा सर्वांना लढण्याची, शिकण्याची, संघर्षाची अन् कधीही हार न मानण्याची जिद्द देत असते.आपण त्या पुतळ्यांतून प्रेरणा घ्यायला हवी. तरच बाबासाहेबांना पुतळ्यांत बंदिस्त होण्यापासून आपण वाचवू शकू.. त्यावर होणाऱ्या राजकारणाला आळा घालण्यात यशस्वी होऊ शकू..तुम्हाला जे वाटतंय ते बिंदास व्यक्त व्हा. आपण नवा दृष्टिकोन आत्मसात केला पाहीजे. प्रतिकांकडून प्रेरणा घ्यायची की त्यांना व्यक्तिपुजेत बंदिस्त करायचं हा कळीचा मुद्दा झालाय.

Monday, 18 April 2022

बाबासाहेब अव्वल दर्जाचे ब्रँड गुरू

बाबासाहेब अव्वल दर्जाचे ब्रँड गुरू होते असं म्हटलं तर वावगं ठरूनये. लोकांना काय अपील करेल आणि ते कसे साध्य केल्यास अपील होईल याची अतिशय सुक्ष्म जाण त्यांच्याठायी होती. जरा विस्तारानं पाहू.
बाबासाहेबांनी चालवलेली वृत्तपत्रे-
1. मूकनायक :- ३१ जानेवारी १९२०
2. बहिष्कृत भारत :- ३ एप्रिल १९२७
3. जनता :-१९३०
4. प्रबुद्ध भारत :- १९५६
बाबासाहेबांनी एकुण चार वृत्तपत्रांची स्थापना केली. शतकानुशतके मूक अवस्थेत जगणाऱ्या स्थितीला दर्शवण्यासाठी, ती अधोरेखित करण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम नाव निवडलं ते मूकनायक... वंचित जगताचा नायक.. मूकनायक.त्यानंतर भारत ही संकल्पना मांडताना भारताच्या अंतर्गत वसणाऱ्या बहिष्कृत भारताची ओळख त्यांनी इथल्या पत्रकारितेला करून दिली.जसजसा वेळ गेला. बाबासाहेबांच्याचळवळीत अस्पृश्यांसोबत,ब्राह्मण व ब्राह्मणेतरांचासहभाग वाढत गेला तेव्हा त्यांनी जनतानावाचे पत्र सुरू केले. पुढे याच जनता चे रुपांतर प्रबुद्ध भारत असे ठेवले. भारत एक राष्ट्र म्हणून इथल्या मागासवर्गीयांवरबिंबवण्याचे सर्वात मोठे क्रेडीट हे फक्त बाबासाहेबांकडे जाते. त्यासाठी त्यांनी निवडलेली नावं, त्यांचं ब्रँडिंग फार महत्त्वाची भूमिका निभावते.बाबासाहेबांनी चालवलेले राजकिय पक्ष-बाबासाहेबांचे तीन राजकिय पक्ष होते. स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्यूलकास्ट फेडरेशन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. स्वतंत्र मजूर पक्षातसुरूवातीला जरी अस्पृश्यांचा भरणा असला तरी पक्षाचे नाव आणि त्यातील मजूरांच्या स्वतंत्र होण्यासंबंधीची ग्वाही आणि आवाहन फार मोठा रोल प्ले करत होते. स्वतंत्र मजूर पक्षाने कामगारांच्या आयुष्यात, त्यांच्या आंदोलनात आमूलाग्र बदल घडवून आणले होते. पुढेजाऊन शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. यात देशातील तमाम शेड्यूल कास्ट मधील जातींना राजकिय पटलावर एकत्र आणून त्यांना त्यांचे राजकिय आणि सामाजिक प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा त्यांचा मानस होता. त्यासाठी त्यांनी पिन पॉईंट होईल असे नाव निवडले. शेड्यूल कास्ट फेडरेशन.. दोन आकडी खासदार आणि आमदार होते त्यावेळेस. काँग्रेसनंतर देशातला सगळ्यात मोठा पक्ष होता शेकाफे. त्यानंतर 1956 साली बुद्धाचा स्विकार करतेवेळी बाबासाहेबांनी जातीय समीकरणांसाठी बनवलेल्या पक्षाला स्वतः विसर्जित करण्याचं प्लानिंग केलं. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना मांडली. यात आंतरराष्ट्रीय पटलावर राजकारण करणारा राजकिय पक्ष बाबासाहेबांना अपेक्षित होता.बाबासाहेबांची पुस्तकं, त्यांची शीर्षकं, त्यांनी लिहीलेली प्रकरणं, त्यांनी वापरलेल्या टर्मिनोलॉजी सारं काही अतिशय सुटसुटीत, स्पष्ट, सामान्य जनांना उच्चार करता येईल असेच होते. त्या नावांचा, संकल्पनांचा कुठेही वावगा अर्थ काढला जाणार नाही, त्याच्या उच्चार अपभ्रंश होणार नाही याची त्यांनी सर्वतोपरी काळजी घेतलेली आढळते. त्यांच्या विचारसरणीत सर्वसमावेशकता होती. म्हणून स्वतः स्थापन केलेल्या शिक्षणसंस्थेचं नाव त्यांनी जनतेला अर्पण केलं.. संस्थेचं नावं ठेवलं...दी पीपल्स एज्युकेशन सोसायटी...

Sunday, 17 April 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दिलिप कुमार

मराठवाड्यातील आंबेडकरी चळवळीचं माहेरघर. मराठवाडा हा शैक्षणिक दृष्ट्या अतिशय मागास. तिथं शिक्षणाचं बीज रोवलं तर लाखो अस्पृश्य बांधवांचा सहज उत्कर्ष होईल म्हणून पीईएस चं सर्वात मोठं जाळं औरंगाबादेतच बाबासाहेबांनी उभारलं. बाबासाहेब जेव्हा केव्हा औरंगाबाद मध्ये दाखल होत तेव्हा त्यांचा मुक्काम रेल्वे हॉटेल ला ठरलेला असायचा. हे तेच रेल्वे हॉटेल आता हॉटेल अशोका या नावानं ओळखलं जातंय.मिलिंद कॉलेजच्या स्थापनेपासून त्याच्या उभारणीपर्यंत माई आंबेडकर त्यांच्यासोबत सावलीसारख्या होत्या. बाबासाहेबांना काहीहवं नको पाहण्यासाठी माईसाहेबांचे धाकटे बंधू बाळू कबीरही सोबतीला होते. त्या काळात दिलीप कुमार लोकप्रियतेच्या शिखरावर होते. त्यांच्या एकमागोमाग आलेले अनेक चित्रपट भयंकर गाजले होते. बाबासाहेबांच्यामुक्कामाच्या वेळेसच नेमकं दिलीप कुमार सुद्धा औरंगाबादलाच सेम हॉटेल मध्ये मुक्कामाला होते.बाळू कबीरांकरवी दिलीप कुमार यांना ते राहत असलेल्या हॉटेलमध्ये बाबासाहेब थांबले असल्याचे कळाले. त्यांनीच दिलीपकुमार आणि बाबासाहेबांची भेट घडवून आणली. प्रायमरी इंट्रोडक्शन बाळू कबीरांनीच करून दिलं. बाबासाहेबांनीहीआपुलकी दाखवत दिलीप कुमार यांचं स्वागत केलं. त्यांच्या अनेक विषयांवर गप्पा झाल्या. राजकारण ते सिनेमा असं बरंच काही बाही. नंतर विषय आला तो मिलिंद कॉलेजचा. दिलीप कुमार यांनी मिलिंद कॉलेजसाठी भरभक्कम देणगी देण्याचा प्रस्ताव बाबासाहेबांपुढेठेवला. बाबासाहेब शांतपणे ऐकत होते. आणि त्यांच्या प्रस्तावावर छोटंसं स्मित करून पुन्हा शांत झाले. दिलीप कुमार यांनी पुन्हा देणगीचा प्रस्ताव समोर ठेवलाआणि मिलिंद कॉलेजच्या प्रवेशद्वाराला स्वतःचे नाव देण्याची अटही ठेवली.आता बाबासाहेब मात्र चिडले. त्यांनी दिलीपकुमार खड्या शब्दात सुनावत म्हटले की, सिनेसृष्टीतील लोकांकडे कॅरेक्टर नामक गोष्टच नसते हे पुन्हा खात्रीशीर पटले. बराच संवाद झाला होता तो. प्रचंड झापून दिलीपकुमार आणि त्याने देऊ केलेले पैसे परतवले होते बाबासाहेबांनी. दिलीपकुमार तेथून निघून गेले.झाल्या प्रकारावर बोलताना बाळू कबीर म्हणाले,"या नटाकडे लाखो रुपये आहेत. आपण ज्या शिक्षण संस्था चालवतो त्यांना सध्या आर्थिक सहाय्याची खूप गरज आहे. आपण त्याच्याशी सलगीने वागला असता आणि त्याला विनंती केली असती तर त्याने आपल्या संस्थेला हजारो रुपयें दान सहज दिले असते.मेव्हण्याच्या शब्दांनी क्रोधित झालेल्या बाबासाहेबांनी बाळू कबीरांना स्पष्ट सुनावलं की,"काय म्हणतोस? मूर्ख आहेस तू. ज्या लोकांनी आपल्या शील, चारित्र्याचे प्रदर्शन मांडून धनदौलत कमावली आहे अशा लोकांकडून मी कधीच पैशांची अपेक्षा केली नाही आणि करणारही नाही. ज्यांनी अनीतीच्या आणि भ्रष्ट मार्गाने धनदौलत जमवली आहे, त्यांच्या मदतीच्या बळावर ज्ञान दानासारखे पवित्र कार्य मी कधीही करणार नाही. मग माझ्या संस्था मेल्या तरी बेहतर!थोडक्यात काय तर... पैशाचं दान देणाऱ्याचं इंटेशन महत्त्वाचं असतं.. त्यानं देऊ केलेली रक्कम ही क्षुल्लक असते. सरकारनं 125 कोटी रुपये दिल्यानं सरकार हे अतिशय संविधानवादी आहे असं माननणाऱ्या डीक्कीच्या उद्योजकांनी सदर प्रसंग जरूर वाचावा. आणि त्यातून योग्य तो बोध घ्यावा. आणि जमलंच तर नैतिकतेचा पाठ घालून देणाऱ्या बाबासाहेबांचं आभार ही मानावं. कारण आज मिलिंद कॉलेज कोणत्याही मदतीविना ताठ मानेनं उभं आहे. अन् या महाविद्यालयाने भारताला एकापेक्षा एक महान लोकं दिलीयेत. त्यांच्याबद्दलही लिहीनच सावकाश.. तूर्तास इथंच थांबतो.‪

सदर घटनेच्या संदर्भासाठी माई आंबेडकर लिखित बाबासाहेबांच्यासहवासात हे पुस्तक चाळता येईल.

Saturday, 16 April 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घर

बाबासाहेबांचे सुरवातीचे दिवस अत्यंत कठीण परीस्थितीत गेले. बॅरिस्टर झाल्यानंतर त्यांनी वकिली सुरु केली. आणि अल्पावधीतच त्यांची एक हुशार वकील म्हणून ख्याती चोहीकडे पसरली. आणि 1930 सालानंतर त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत गेली. तेव्हा बाबासाहेबांचं कार्यालय परळच्या दामोदर ह़ॉल जवळ होतं. आता घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता वाढला होता. पोयबावाडीतील घर अपूरं पडू लागलं होतं. पुस्तकांची आबाळं होत होती. म्हणून त्यांनी आता स्वतःसाठी नवीन घर बांधण्याचा निश्चय केला.बाबासाहेबांनी स्वतःची इमारत उभी करताना त्यात ग्रंथालय कसे असावे, याचा अभ्यासपूर्ण आराखडा तयार केला होता. परदेशात पाहिलेल्या उत्तमोत्तम ग्रंथालयांची वैशिष्ट्ये आपल्याकडेही असावीत, असा प्रयत्न त्यांनी केला. त्या रचनेत तीन-तीन खोल्यांचे दोन ब्लॉक्स राजगृहाच्या तळमजल्यावर बांधून घेतले होते. त्या दोन ब्लॉक्समध्ये त्यांनी आपल्या कुटुंबीयांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. राजगृहाच्या पहिल्या मजल्यावर डॉ.बाबासाहेबांनी स्वत:च्या राहण्याच्या सोयीबरोबरच आपल्या प्रिय ग्रंथालयाची आणि कार्यालयाचीही सोय केली होती. त्यांनी स्वत: आराखडा तयार करून त्याप्रमाणे सोयी करून घेतल्या होत्या.१९३० मध्ये त्यांनी दादरच्या हिंदू कॉलनीत ९९ व १२९ क्रमांकाचे प्रत्येकी ५५ चौरस यार्ड क्षेत्रफळाचे दोन प्लॉट खरेदी केले. पाचव्या गल्लीतील १२९ क्रमांकाच्या प्लॉटवर आपल्या कुटुंबीयांबरोबरराहण्यासाठी इमारत बांधण्याचे ठरवलं तर तिसर्यागल्लीतील ९९ क्रमांकाच्या प्लॉटवर भाड्याने देण्यासाठीची इमारत बांधण्याचे नक्की केले. बांधकामासाठी त्यांनी सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाकडून कर्ज मिळवले आणि तात्काळ बांधकाम सुरू केले. बांधकामावर देखरेख करण्याचे कामास श्री. आईसकर यांना नेमले होते. १९३१ सालच्या जानेवारी महिन्यात १२९ क्रमांकाच्या प्लॉटवर राहण्याच्या वास्तूचे बांधकाम सुरू केले. ते बांधकाम १९३३ मध्ये पूर्ण होऊन "राजगृह' ही राहण्याची वास्तू तयार झाली.प्लॉट क्रमांक ९९ वर दुसर्या इमारतीचे बांधकाम १९३२ मध्ये सुरू झाले. ते बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यांनी त्या इमारतीचे नाव "चार मिनार' असे ठेवले. "राजगृह' हे नाव हिंदू संस्कृती आणि बौद्ध संस्कृतीशी संबंधित होते, तर "चार मिनार'हे नाव मुस्लिम संस्कृतीशी संबंधित होते. इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम १९३१ च्या जानेवारी महिन्यात सुरु होऊन ते सन १९३३ मध्ये पूर्ण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या कुटुंबीयांसह "राजगृह' या आपल्या सुंदर व प्रशस्त वास्तूत राहण्यास आले होते. पुढे ग्रंथांच्या खरेदीच्या आणि इतर गोष्टींच्या कर्जाची फेड करण्यासाठी ९ मे १९४१ रोजी त्यांनी "चार मिनार' ही इमारत विकली. मात्र "राजगृह' ही वास्तू त्यांनी कायम आपल्या मालकीची ठेवली.

Friday, 15 April 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे शिक्षण

किती शिक्षण अन् किती पदव्या जवळ असतीलतर त्यास स्कॉलर म्हणता येईल? पीएचडीसाठी अपीयर होणं हे स्कॉलर असल्याचं लक्षण मानता येईल का? तर बाबासाहेबांचं शिक्षण पाहूयात आपण.बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात असताना विद्यापीठाच्या ग्रंथालयात अठरा तास बसत असत. ग्रंथालयातील बुक न् बुक त्यांनी चाळलं होतं. कोलंबिया विद्यापीठाच्या तीन वर्षाच्या वास्तव्यात त्यांनी अनुक्रमे

1. अर्थशास्त्रातील29 पदवी अभ्यासक्रम पूर्ण केले.

2. इतिहासातील वेगवेगळ्या 11 अभ्याक्रमांची पूर्तता केली.

3. सोशियोलॉजी मध्ये सहा कोर्सेस केले.

4. अँथ्रोपोलॉजी मध्ये चार

5. पॉलिटिक्स मध्ये तीन

6. आणि फ्रेंच तसंच जर्मन भाषांचा एकेक कोर्स पूर्ण केला.तर बाबासाहेबांनी 2 वर्षे 11 महिने 18 दिवसांच्या कालावधीत एकुण 55 शाखांचा अभ्यास पूर्ण केला. थोडक्यात 55 कोर्सेस पूर्ण केले. इथं आम्ही बीए करण्यासाठी तीन वर्षे वाया घालवतो.हा प्रवास फक्त त्यांचा कोलंबिया विद्यापीठातलाच.इंग्लंडमधला अजून बाकी आहे. 

विद्वान कोणाला म्हणावं बरं? नव्या वाटा चोखाळणाऱ्या माणसाला की, रि-सर्च करून नाव मिळवणाऱ्या माणसाला.. बाबासाहेबांचं कोलंबियाचं शिक्षण तर पाहीलंच. आता जरा त्यांच्या शिक्षणातील महत्त्वाच्या अचिव्हमेंट्स पाहू.1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागास जातीतील पहिले वकिल होते.

2. डॉ. आंबेडकर हे असे पहिले भारतीय होते की ज्यांनी कोणत्याही परदेशी विद्यापीठात अध्ययन करून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली होती.

3. बाबासाहेब स्वतः संस्कृत भाषापंडित होते. आणि ही भाषा ते जिद्दीने स्व-अध्ययन करून शिकले. अस्पृश्यांना संस्कृत भाषा शिकण्याचा अधिकार नव्हता.

4. बाबासाहेब 1907 साली मॅट्रिकची परिक्षा पास झाले. त्या परिक्षेत त्यांना 750 पैकी फक्त 280 गुण मिळाले. ते 280 गुण प्रचंड मोठे होते. कारण महारांमधून मॅट्रिक होणारा पहिला विद्यार्थी म्हणजे डॉ. आंबेडकर...

5. मे-१९१६ मधे डॉ. गोल्डनवेझर यांच्या सेमीनारमधे “Caste In India, Their Mechanism, Genesis & Development ह्या विषयावरत्यानी एक निबंध वाचला. या निबंधानं अमेरिकेतली बुद्धिजीवी वर्गात प्रचंड खळबळ माजवली. जातीव्यवस्थेच्या या क्रुरपणाचा अमेरिकेतील विद्यापीठातून जाहीर निषेध होण्याची पहिलीच वेळ होती.बाबासाहेबांमुळेभारतीय समाजव्यवस्थेची किड जगासमोर आली.

6. जुन-१९१६ ला “National Dividend of India-A Historical & Analytical Study हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला. ह्या प्रबंधाने प्रभावित झालेल्या कोलंबियातील लोकांनी त्यांच्या नावे शानदार मेजवानीचं आयोजन देखील केलं होतं. आणि स्वतःच्याच देशात मात्र अपमान पदरी पडला.

7. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डी. एस्सी. म्हणजे डॉक्टरेट ऑफ सायंस मिळवणारे बाबासाहेब हे भारतातील पहिले व्यक्ती.

8. समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र,कायदा आणि तत्त्वज्ञान ह्या सहा क्षेत्रांत बाबासाहेबांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं.

9. वरिल सहाही क्षेत्रात त्यांनी प्रबंध सादर करून डॉक्टरेट मिळवल्यात. त्यांनी सादर केलेले प्रबंध इतके महत्त्वाचे होते की त्याकाळी ब्रिटनमधल्या टॉपमोस्ट प्रकाशकांनी ते प्रबंध पुस्तकरुपाने प्रकाशित केले. त्यातील कित्येक प्रबंध आज पन्नासहून अधिक आवृत्त्या निघूनही पुन्हा पुन्हा प्रकाशित होत आहेत.

10. बाबासाहेबांच्याइंग्रजी भाषेचे खरे गुरू हे त्यांचे वडिलच होते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अर्थव्यवस्था

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचे नेते म्हणून संकुचित करण्यातदेशातील माध्यमांनी जी मोलाची मेहनत घेतलीये त्याला तोड नाही. त्यामुळे राष्ट्रनिर्मितीत त्यांचं असलेलं योगदान केवळ अनुल्लेखानेच टाळले गेले आहे.दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर ब्रिटीशांनी भारतातून पाय काढता घेतला. तशी सत्तेच्या हस्तांतरणाची प्रोसेस ही 1943 सालीच सुरू झाली होती. परंतू दुसऱ्या महायुद्धाचा बराचसा फटका तत्कालीन भारतीय अर्थव्यवस्थेला बसला होता. यासंबंधी ब्रिटीश सरकार भारतातील अनेक विद्वानांची चाचपणी करत होते. त्याच सुमारास बाबासाहेबांची बीबीसी ला प्रदीर्घ अशी मुलाखत झाली. त्यात त्यांनी गांधीजी आणि फ्री मार्केट पॉलिसी, जगातली युद्धखोरी, 1945 साली भरलेल्या ब्रेटनवुड परिषदेत घडलेल्या गोष्टींचे जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटणारे पडसाद, गोल्ड स्टँडर्ड, करंसी, ऑईल पॉलिटिक्स, पाकिस्तान सारख्या विषयांवर सडेतोड मत व्यक्त केलं. त्यात ते असं म्हणून गेले की, गांधी प्रणित काँग्रेस ने कधीच फ्री मार्केट पॉलिसीला होकार दिलेला आहे त्यामुळे ब्रिटीशांना आता भारतात राहून वसाहती कंट्रोल करण्याची आवश्यकता नाही. त्या मुलाखतीने भारतीय राजकारणात प्रचंड खळबळ माजवली होती. आता बाबासाहेबांशी उघड पंगा घ्यायला भले भले कचरू लागले होते. खरं तर 1936 ते 1953 हा तब्बल अठरा वर्षांचा कालखंड त्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा आणि सर्वोच्च योगदान असलेला कालखंड.दूर्दैवाने पटेलांसहित सर्व दिग्दर्शकांनी बनवलेल्या चित्रपटांत हा कालखंड दाखवलेलाच नाही. असो...भारत स्वतंत्र झाला. बाबासाहेबांकडे संविधानाच्या निर्मितीसोबतचयुद्धपश्चात स्थितीतील अर्थव्यवस्था उभारण्याचे कामही आले. यात शेतीत सुधारणा, शेती- आधारित उद्योगांची नव्याने उभारणी, बांधणी, अस्तित्वात असलेल्या उद्योगांचे जतन, डबघाईला आलेल्या क्षेत्रांचे पुनर्वसन करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर आली. याचं सिस्टमायझेशन करण्यासाठी बाबासाहेबांनी दोन महत्त्वाच्या संस्था उभारल्या.

1. Reconstruction Committee of Council (RCC)

2. Planning Commision

यातील पहिली आर.सी.सी. चे बाबासाहेब स्वतः सदस्य राहीले. आणि त्यातून उभी केलेल्या पॉलिसी कमीटी फॉर इरिगेशन अँड पॉवर या दुसऱ्या सब-कमिटीचे ते अध्यक्ष होते. स्वातंत्र्यानंतर उभ्या राहीलेल्या अर्थव्यवस्थेचा सांगाडा बनवण्याचे काम हे बाबासाहेबांचेच.भारतीय चलनाचा दर स्टेबल आणि निश्चित ठेवण्यात त्यांनी 1953 पर्यंत यश मिळवलं. भाक्रा नांगल धरण, हिरकूड प्रकल्प, महानदी प्रकल्प हे सारं काही त्यांचंच देणं. शेती अन् शेतजमीनींचं राष्ट्रीयकरण करण्याची योजना सुद्धा त्यांचीच. उभारलेल्या धरणांतून उपसा सिंचनाद्वारे वीज निर्मिती शक्य करून दाखवणारे सुद्धा बाबासाहेबच होते. थोडक्यात काय... तर पाणी, शेती, शेतीवर आधारित उद्योग, इतर उद्योगधंदे, आरसीसीची स्थापना, आरबीआयची स्थापना, प्लानिंग कमीशन, पॉलिसी कमीशन असं बरंच काही देऊन आपली अर्थव्यवस्था त्यांनी नव्याने उभी केली.

बाबासाहेबांचं अर्थशास्त्राचं ज्ञान अगाध होतं. त्यांना स्टॉक मार्केट च्या एकुण कारभारात विशेष रस होता. सुरूवातीच्या काळात म्हणजेच 1915 नंतर अर्थार्जनासाठी त्यांनी शिकवण्या घेण्यास सुरूवात केली होती. ती अतिशय अल्प कालावधीची गोष्ट असल्याने त्याची नोंद फारशी घेतली गेलेली नाही. परंतू अधिक पैसे मिळवायचे असतील तर सोबतीला अजून एखादा धंदा सुरू करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात रुजत होता.अखेरीस त्यांनी कंपनी काढण्याचा निर्णय घेतला. फोर्ट मध्ये दलाल स्ट्रिट जिथं सुरू होतो.. त्याच्या अगदी डाव्या बाजूच्या लेन मधून बाहेर पडल्यानंतर पेन चं दुकान लागतं त्याच्या मागच्या बाजूस बाबासाहेबांनी कंपनीचं ऑफिस थाटलं. आता त्या ठिकाणी आयसीआयसीआयचीबिल्डींग उभी आहे. कंपनीचं नाव होतं..'स्टॉक्स अँड शेअर्स अॅडव्हाझर्स'.कंपनीचं कार्य़ालय सुरू झालं. आणि अवघ्या दहाएक दिवसांतच भीमराव नावाचा एक कंसल्टंट जबरदस्त बुद्धिमान माणूस आहे. त्याचा सल्ला खुप फायदा मिळवून देणाऱा असल्याची बातमी चारो-ओर पसरली. दलाल स्ट्रीटवरील शेटजी-लाटजी भीमरावांकडे सल्ला मागण्यासाठी रांगा लावून उभे राहत होते. आजूबाजूच्या अनेकांची दुकानं थंड पडली. पण शेवटी व्हायचं तेच झालं... कुठूनतरी बातमी लागली की भीमराव नावाचा हा माणूस अस्पृश्य आहे, त्याची कचेरी ही धेडाची कचेरी आहे म्हणून.. बस्स त्या दिवसापासून तिथं कुणी ढूंकून पहायला ही तयार झालं नाही. अखेरीस भीमरावांनी वैतागून ती कचेरी बंद केली अन् पुढील शिक्षणासाठी परदेशी रवाना झाले. अन् जेव्हा ते परत आले तेव्हा भीमरावांचा... डॉ. बी. आर. आंबेडकर झालेले होते.संदर्भासाठी चांगदेव भवानराव खैरमोडे लिखित डॉ. भीमराव रामजी आंबेडकर खंड १ चाळता येईल. मला आता पान क्रं. नीटसं लक्षात नाही. पण पान क्रमांक १०२, किंवा आसपास मिळायला हरकत नसावी. हा काळ 1917 च्या सुमारासचा असावा.

Thursday, 14 April 2022

डॉ बाबासाहेब आंबेडकर- फॅशन स्टेटमेंट

बाबासाहेबांच्याव्यक्तिमत्त्वाच्या अनेक महत्त्वपूर्ण पैलूंपैकी त्यांचं फॅशन स्टेटमेंट हे एक महत्त्वाचं अंग आहे. ते अशासाठी की त्या काळात अप टू डेट राहणारी केवळ तीनच माणसं भारतीय समाजकारणात अग्रेसर होती. पं. जवाहरलाल नेहरू, बॅ. मोहम्मद अली जिन्ना आणि तिसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.या तिघांपैकी बाबासाहेब सोडले तर बाकी दोघे हे सधन कुटूंबातील. बालपण आणि तारुण्य सर्व सुख सोयी आणि संसाधनांनी भरलेल्या वातावरणात गेलं. याउलट बाबासाहेबांच्याघरी कमालीचं दारिद्र्य होतं. जातीव्यवस्थेचे,अस्पृश्यतेचे चटके अलग. तरी वकिली व्यवसायातून कमावलेल्या संपत्तीतून त्यांनी स्वतःचं एक फॅशन स्टेटमेंट तयार केलं होतं. तसे ते स्वभावाने पूर्णतः युरोपीयनच होते. पोटाला खायला मिळालं नाही तरी चालेल पण अंगावर चांगलं कापड हवं हा त्यांचा आग्रह असे. बाबासाहेबांना सिडनहम कॉलेजमध्ये असताना पहिला पगार मिळाला. त्यांनी रमाईला सांगितलं की घरातल्या सर्वांना कपड्यांची मनसोक्त खरेदी करून घे. रमाई सुद्धा जिंदादील माणसाचीच सोबती. बैलगाडी भरून कपड्यांची खरेदी केली. हा भाग वेगळा की त्या वेळी बाबासाहेबांना नऊशे रुपये पगार झाला होता. तर बाबासाहेबांकडे उंची सुट होते. प्रत्येक मोसमात घालता येतील अशा पद्धतीने त्यांनी कापडांची निवड सुट साठी केलेली होती. प्रत्येक सुटची शिलाई वेगळ्या ढंगाने केलेली होती. प्रत्येक सुट हा थ्री पीस असे. सुटच्या आत पेनांसाठी वेगळा खिसा, अचानकपणे टिपणे काढल्यानंतर कागद सुरक्षित रहावा म्हणून असलेला वेगळा खिसा अशी ठेवण असायची. त्यातल्या त्यात त्यांच्या जोधपुरी सुटची मिजास ही भारीच असायची. पंजाबात असताना त्यांनी परिधान केलेला काळा जोधपुरी सुट हा मला त्यांनी आजवर परिधान केलेला सर्वात बेस्ट सुट वाटतो. अन् दुसरा सुट हा तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्यासोबत असताना घातलेला पांढऱ्या रंगाचा जोधपुरी सुट. त्यांची पँट मस्त ढगाळ, लांबीला भरपूर अन् पोटापर्यंत ओढलेली असायची. त्यांचे वापरायचे बेल्ट हे साधे असले तर उच्च दर्जाचे होते. त्यांना हॅट आवडत. त्याचं एक वेगळं कलेक्शन होतं त्यांच्याकडे. बाबासाहेबांच्याचष्म्याची फ्रेम मला सर्वात जास्त स्टाईलिश आणि सेक्सी फ्रेम वाटते. इथं सेक्सी या शब्दावर आकांडतांडाव करण्यापेक्षा डोळ्यांवर घातलेला गॉगल किंवा इतर चष्मा हा तुमच्या व्यक्तीमत्त्वाला अधिक मादक बनवत असतो हे लक्षात घ्या. तर त्यांच्या चष्म्याच्या फ्रेम ह्या त्यांनी अनेकदा युरोपात असताना बनवून घेतल्या होत्या. बाबासाहेबांचं कपाळभव्य होतं. डोळे मोठे होते. कान सुद्धा मोठे होते. त्यांचे हात आणि हातांची बोटं सुद्धा साधारण लांबीपेक्षा मोठी होती. ही सारी गुणवैशिष्ट्ये बुद्धाच्या शरिरातही होती. खरे तर ही लक्षणे एका महान प्रकांड पांडित्याची असतात. त्यामुळे गोलाकार... थोडक्यात अंडाकृती फ्रेमचा चष्मा त्यांना परफेक्ट शोभायचा. बाबासाहेब शर्टवर तसे फारच कमी असायचे. फावल्या वेळेत ते लेहंगा किंवा लुंगी नेसत. त्यांचा फक्त शर्टवरचा एकमात्र फोटो आहे तो मिलिंद कॉलेज, औरंगाबदमधला.आता थोडंसं पुढे येऊयात... बाबासाहेबांच्याखिशाला एकाच वेळेस सहा पेन असत. त्यातील कित्येक पेन महागडे असायचे. तब्बल दोनशे रुपयांचे पेन असायचे ते. त्यांना इन्क पेन आवडायचे. त्यांची पेन पकडण्याची पद्धत सुद्धा अफाट होती. कित्येक पेनवरची कव्हर कलर अजूनही शाबूत आहेत. इतक्या लेवीश पेनचं कलेक्शन अजूनतरी कोणा इतरांकडे असेल असे वाटत नाही.बाबासाहेब युरोपीयन स्टाईलवालं चैनीचं घड्याळ वापरायचे. तसंच त्यांच्या हातातील घड्यांळ्यांचं कलेक्शन सुद्धा फार सुंदर होतं.बाबासाहेब सुट परिधान करताना आतला शर्ट हा कोटांच्या पुढे कसा असेल आणि शर्टाला असलेली बटणं आणि पुढचं घड्याळ शिस्तीत कसं असेल याकडे खुप बारकाईने लक्ष ठेवायचे. तीच गत त्यांच्या बुटांच्या बाबतीत. त्यांनी वापरलेले बुट हे त्या काळातले सर्वोत्तम बुटांपैकी एक होते. आज अनेक ठिकाणी त्यांनी वापरलेल्या बुटांचे जोडे आपल्याला पहायला मिळतात. मी मघाशीच म्हटलं की त्यांना हॅटचा शौक होता. त्यांनी विविध प्रकारच्या हॅट वापरल्या, काही वेळा कॅप वापरल्या. राऊंड कॅप सुद्धा घातली. तसेच काळ्या चष्म्यांच्या बाबतीतही तीच गत होती. त्यांच्याकडे निरनिराळ्या रंगाच्या टाय होत्या. कोणत्या रंगाच्या सुटसोबत कोणत्या टाय असाव्यात याबाबतचात्यांचा चॉईससुद्धा भन्नाट होता. डायबिटीसचा त्रास झाल्यानंतर त्यांनी काठीचा आधार घ्यायला सुरूवात केली. पण त्यांच्या काठीवर नक्षीकाम आणि काठ्यांचं कलेक्शनही तसंच स्टाईलिश होतं.बाबासाहेबांनी अनेकदा भावूक होऊन सांगितलं होतं की, न्हावी पैसे घेऊन सुद्धा त्यांचे केस कापत नसे. त्यांची बहिणच त्यांचे केस कापून देई. परंतू बाबासाहेबांनी कधी वाढलेले केस, दाढी असा अवतार ठेवला नाही. क्लिन शेव्ह्ड असायचे ते. बाबासाहेबांचं राजबिंड रुप खुलून दिसायचं. त्यांना उद्धारकर्ता, बाप या भावनेतून पाहील्यानं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं असं आकलन करण्याला आपण वावच ऊरू दिला नाही. सेम केस तात्यासाहेब फुल्यांच्या बाबतीतही म्हणता येईल. त्यांचंही स्टाईल स्टेटमेंट असंच अफाट होतं. तर दोस्तहो थोडक्यात काय तर... कुणीही कधी तुम्हाला म्हटलं की एवढं लॅविश का राहता? हे असं सोनं नाणं का घालता? हे असलं उंची का जेवता ? तर एवढंच सांगा.. आमच्यात हे असंच करतात.. असंच खातात.. असेच कपडे घालतात. आपल्या शेकडो पिढ्या बिनकपड्यांच्या हिंडल्यात. एक सितारा जन्माला आला अन् त्यानं सारं काही पालटून टाकलं. जे घालाल ते चांगलंच घाला. भारीच घाला. आपलं सौंदर्यशास्त्र ठासून सांगा, दाखवा अन् मिरवा ही. याला भले ते निर्लज्ज प्रदर्शन म्हणोत तर म्हणूदे.. मेहनतीच्या कमाईने आलेल्या वस्तूला निर्लज्जपणा म्हणत नाहीत. स्वाभिमान म्हणतात.

Sunday, 18 June 2017

भारतीय नोकरशहा

भारतातील नोकरशहा हे पुस्तकी किडे असतात. त्यांच्या हिशोबात माणसासाठी नियम नाही तर नियमांसाठी मनुष्य आहे. एखाद्या नववधूच्या हातावरील मेहंदीप्रमाणे त्यांचे हात लाचेने व भ्रष्टाचाराने रंगले आहे. आवश्यक तेवढे वेतन (गलेलठ्ठ) वेतन मिळत असूनही एखाद्या राक्षसाला लाजवेल अशी त्यांची वेतनवाढीची भुक आहे. भारतातील महागाई ची झळ सर्वात जास्त सर्वसामान्यांना बसत असते.पण पर्वताएवढे वेतन असणाऱ्या नोकरशहाला बसत नाही. वेतनवाढीमूळे आर्थिक भेत वाढत जाते. समाजात पैशाच्या बिछान्यावर झोपणाऱ्यांचे पारडे जड तर दाण्यासाठी हात पुढे करणाऱ्यांचे पारडे हलके राहून फक्त श्रीमंत आणि गरिब यांची दरी वाढल्यामुळे संविधानात असलेली जातीवार आरक्षणाची नोंद काढून ती आर्थिक स्तरावर केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.

भ्रष्टाचारी देशात भारताला अग्रस्थानी आणण्याचे काम करणाऱ्या नोकरशहांची लाचखोरी ही एखाद्या भिकाऱ्याला लाजविण्यासारखी आहे. एकप्रकारे भारताच्या प्रगतीचे द्वार हे या नोकरशहांनी बंदच केले आहे.

आपल्या ऐशोआरामावर लाखो पैसे खर्च करणारे हे महाभाग पोटाच्या दाण्यासाठी हात पुढे करणाऱ्या भिकाऱ्याच्या हातात एक रूपया घालायला सुद्धा त्यांचे हात चुंबकाप्रमाणे ओढल्याप्रमाणे मागे येतात. आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करून आकाशही ठेंगणे करणाऱ्या या नोकरशहांनी दोन वेळच्या दाण्यासाठी भटकणाऱ्यांना या जमिनीवर वितभर जागासुध्दा शिल्लक ठेवली नाही.

एकंदरीत भारत अविकसित असण्यात या मंडळीचा मोलाचा वाटा आहे.

-महेश तेजराम हातझाडे

(प्रकाशित दैनिक देशोन्नती, दि. ७ जुलै २००८)